औरंगाबाद शहरातील 11 पाण्याच्या टाक्यांचे काम मार्च पर्यंत पूर्ण करा, मेन लाईनवरील अनधिकृत नळ कनेक्शनचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

औरंगाबाद, दि 19 सप्टेंबर – नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 11 नवीन ईएसआर (पाण्याच्या टाक्याचे काम) फेब्रुवारी- मार्चपर्यंत पूर्ण करावे तसेच या टाक्यांना पाणीपुरवठा करणारी लाईन याचे काम देखील या कालावधीत पूर्ण करावे असे निर्देश औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिले.
दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रशासक महोदयांनी स्मार्ट सिटी कार्यालयात पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
अनाधिकृत नळ कनेक्शन बाबत आढावा घेताना त्यांनी निर्देश दिले की अनधिकृत नळ कनेक्शन शोधणाऱ्या तिन्ही पथकांनी कारवाई तीव्र करावी आणि मेन लाईन वरील अनधिकृत नळ कनेक्शन आणि व्यवसायिक नळ कनेक्शन यांच्या सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करावा.
यावेळी ते म्हणाले की, अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम दरम्यान अभय योजनाच्या तिन्ही पथकाने प्रभावीपणे वापर करावा. सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त ब.भी नेमाने, उप आयुक्त संतोष टेंगळे, कार्यकारी अभियंता एम बी काझी व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.