बीएस्सीच्या १२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षेपासून रोखले ! संबधित महाविद्यालयास नोटीस, चौकशी समिती गठीत करणार !!
-परीक्षा विभागाने केली पर्यायी व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ : बी.एस्सी संगणकशास्त्र या विषयात प्रथम सत्राची परीक्षा देणा-या १२३ विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षा केंद्राने परीक्षेपासून रोखल्याचा प्रकार घडला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून या विद्यार्थ्यांची ’होम सेंटर’ वर परीक्षा घेऊन त्यांचे नुकसान वाचविले. संबंधित महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस बाजावण्यात येणार असून चौकशी समिती गठीत करण्यात येणार आहे.
या प्रकरणाची माहिती अशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर नोव्हेंबर- डिसेंबर २०२४ च्या परीक्षा नियोजित वेळापत्रक व निश्चित केंद्रावर सध्या सुरु आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय (विद्यापीठ गेट परिसर) या परीक्षा केंद्रावर बीएससी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांचे मिलिंद महाविद्यालय (नागसेनवन) येथील ६७ विद्यार्थी) व डॉ.रफिक झकेरिया महिला महाविद्यालय (नवखंडा) येथील ५६ परीक्षार्थी असे एकूण १२३ परीक्षार्थी या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र निश्चित केले होते.
पत्र संदर्भ क्र.परीक्षा/समन्वय/२०२४/७५७, दि.१३/१२/२०२४ नुसार ज्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वेळेत भरलेले आहेत त्यांना परीक्षा प्रवेशपत्र निर्गमित केलेले आहेत. या परीक्षेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावर एकुण सहा महाविद्यालयांचे पाच अभ्यासक्रमांचे विद्यार्थी परीक्षा देणार असल्याबाबतची संपूर्ण आकडेवारी (कोर्स, कॉलेज समरी शिट) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मला व वाणिज्य महाविद्यालयास १५ डिसेंबर रोजीच पाठविण्यात आली होती. तथापि या केंद्रावर (दि.१७) मंगळवारी सकाळच्या सत्रात बी.एस्सी संगकणशास्त्र या विषयाच्या १२३ विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांनी परीक्षेसाठी प्रवेश दिला नाही.
या संदर्भातसंबंधित महाविद्यालयाने विद्यापीठ परीक्षा विभागास कसलीही कल्पना न देता या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास ऐनवेळी नकार दिला. संबंधित बाब समजल्यानंतर परीक्षा विभागाने तात्काळ मिलिंद विज्ञान महाविद्यालय (६७ विद्यार्थी) व डॉ.रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा (५६ विद्यार्थी) या ’होम सेंटर’वर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा तात्काळ घेण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे संबंधित महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहु दिला नाही, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.
नोटीस बजावणार, चौकशी समिती
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कलम ४८ (४) नूसार संलग्नित महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा घेणे बंधनकारक आहे. असे असतानांही डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांना परीक्षेपासून ऐनवेळी रोखले. या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात दोषी सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी कळविले आहे.