2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा? अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक, बैठकीत सहभागी व्हा
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांना आवाहन

JALNA | – आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचे सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
आतापर्यंत काय मिळालं? काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार ? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून, आपापली कामे सोडून बैठकीला या असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून, ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे. आता विजय मिळवायचा असं सांगत मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार, आत्ताच सगळं सांगणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही, असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार, पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. आमचा हा लढा शेवटचा पण आमचा संयम बघू नका, पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करू नका, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ठणकावलंय. लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका, सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका. उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.