
RAIGAD भारत देशाला सक्षम व मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे गौरवोद्गार खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीतील पक्ष प्रवेश कार्यक्रमात काढले. पाली सुधागड सह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस संघटनात्मक दृष्ट्या मजबूत व बलाढ्य होत आहे. विकासात्मक दृष्टीकोन ठेवून विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपच्या प्रवाहात सामील होत आहेत. सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का देत पाच्छापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व असंख्य कार्यकर्त्यांनी दि.(31) मे रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
पाली सुधागड भाजप संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात सर्व प्रवेश कर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाश देसाई, भाजप नेत्या गीता पालरेचा, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, आलाप मेहता, माजी तालुकाध्यक्ष दादा घोसाळकर, तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, आरिफ मणियार, रेंद्र खाडे, शरद चोरगे, प्रणाली शेठ आदींनी स्वागत केले. यावेळी भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर श्रीकांत ठोंबरे यांची सुधागड भाजपाच्या अध्यक्ष पदी फेर निवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
प्रवेशकर्त्यात उत्कर्षा रोशन बेलोसे ग्रु.ग्राम. पाच्छापूर सरपंच, अंकिता अशोक हुले ग्रु.ग्राम.पाच्छापूर उपसरपंच आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले की, सुधागड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर येत्या काळात कमळ फुलणार आहे. पाच्छापूर ग्रामपंचायती पासून सुरुवात केली असून, पुढे हे लोन तालुक्यात पसरेल असे ठोंबरे म्हणाले.