वाल्मिक कराड सरकारचा जावई आहे का ? सरपंच संतोष देशमुख हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही ? कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल
परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा का मारला आहे?

छत्रपती संभाजीनगर -: वाल्मीक कराड महायुती सरकारचा जावई आहे का ? सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही ? परभणी मध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिस आक्रमक होती, बीडमध्ये कारवाई करताना आता पोलिसांच्या हाताला लकवा मारला आहे का? सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही, असा हल्लोबोल माजी मंत्री तथा कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर चढवला. सोशल मीडियावर त्यांनी राज्य सरकार व गृह विभागावर सडकून टीका केली.
यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अजून अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मीक कराड हा सरकारचा जावई आहे का असा सवाल आज माझ्यासह महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. बीड मध्ये बिहार सारखी परिस्थिती झाली आहे.
अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जातात, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मीक कराडला अटक का करू शकत नाही. परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा का मारला आहे? संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही. वाल्मीक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे.आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.