महाराष्ट्र
Trending

महावितरणचे कर्मचारी धावले मनपाच्या मदतीला जलशुद्धीकरण केंद्रातील बिघाडाची युद्धपातळीवर दुरुस्ती

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत यंत्रणेत गुरुवारी बिघाड झाला. हा बिघाड महानगरपालिकेच्या अखत्यारित असूनही त्यांचे कर्मचारी यायला लागणारा वेळ आणि शहराच्या पाणीपुरवठ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने काम करत वीजपुरवठा पूर्ववत केला.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात महानगरपालिकेच्या विद्युत यंत्रणेतील क्युबिकलमध्ये दुपारी पावणेदोनच्या सुमारास मोठा आवाज होऊन 33 केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा बंद झाला. ही बाब महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या बिडकीन कार्यालयास कळवली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून बिघाडाचा शोध घेतला, तेव्हा क्युबिकलला जाणाऱ्या केबलचा जॉइंट खराब झाल्याचे आढळले. उच्चदाब जोडणीमध्ये क्युबिकलची जबाबदारी ग्राहकाची असते.

मात्र महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजीनगरातून येण्यास वेळ लागणार होता आणि कामासही विलंब झाला असता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश वाहुळे, तांत्रिक कर्मचारी जितेंद्र हाडे, रमेश जाधव, सोपान निळ, विजय वीर, रमेश देवरे, नवनाथ पालवे, अमजद शेख, अशोक सुरासे यांनी महानगरपालिकेच्या पथकाची वाट न पाहता स्वंयस्फूर्तीने दुरुस्तीचे काम सुरू केले. सर्व प्रकारची तांत्रिक तपासणी करून आणि खात्री करून अथक परिश्रमाने सदोष केबल बदलली आणि दुसरी केबल जोडून दुपारी 4.20 वाजता जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युतपुरवठा सुरळीत केला.

Back to top button
error: Content is protected !!