महाराष्ट्र
Trending

आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले!

मुंबई पोलिसांनी तिघांना केली आटक

MUMBAI – आरे कॉलनीतील जंगलात रस्त्यालगत बेवारस सापडलेल्या वृद्ध महिलेच्या गायब होण्यामागचं सत्य अखेर शोधून काढत मुंबई पोलिसांनी तिच्या नातवासह दोघांना अटक केलीय. यशोधरा गायकवाड असं या 70 वर्षीय आजीबाईंचं नाव असून, त्यांच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजी कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्याच्या नातवाच्या दाव्यावर मुंबई पोलिसांना संशय आला. कारण ती वृद्ध महिला ज्या अवस्थेत पोलिसांना सापडली होती, त्यात ती एकटी मालाडहून आरेच्या जंगलात पोहोचण शक्यच नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला. अखेर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजनं नातवाचा खोटारडेपणा पोलिसांनी उघड केला. या फुटेजमध्ये घटनेच्या त्या दिवशी नातू अन्य दोघांच्या मदतीनं आजीला एका चादरीतून उचलत रुग्णालयातून बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी नातवाला इंगा दाखवताच सारं सत्य बाहेर आलं.

आजीची तब्येत कॅन्सरमुळे दिवसेंदिवस खालावत चालली होती. जागेवर पडल्यामुळे तिच्यावर 24 तास लक्ष देणं कठीण झालं होतं. घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं आजीच्या उपचारांची शक्यताच नव्हती. त्यामुळे अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून नैराश्येच्या भरात हे कृत्य नातवानं केल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती आरे कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर नातू सागर शेळके, त्या आजीचा दीर आणि रिक्षावाला यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. आरे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यशोधरा गायकवाड या आपला नातू सागर शेवाळे, नातसून आणि पणतू यांच्यासोबत मालाड परिसरात राहतात. 20 जूनच्या सकाळी सागर आणि त्याची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळीच अंधेरी परिसरात आपल्या कामावर निघून गेली. सागर हा एका ठिकाणी ऑफिसबॉय म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी एका ठिकाणी घरकाम करते. या दोघांना एक 11 वर्षांचा मुलगा आहे. हे कुटुंब आपल्या आजीसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरातील हनुमाननगरमध्ये एका छोट्या खोलीत राहतात.

दोघांची कमाई जेमतेम असल्यानं घरची परिस्थितीही बेताचीच आहे. शनिवारी सागर आजीला फारच त्रास होऊ लागल्यानं एका मित्राच्या साथीनं कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, तिथं आजीला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला, आजीच्या दुर्धर आजारामुळे तिच्यासह घरातील सर्वांचंच जगणं मुश्कील आहे, या भावनेनं त्यानं आजीला रात्रीच्या काळोखात आरेतील एका निर्जनस्थळी सोडत तिथून पळ काढला. पुढे जेव्हा हे प्रकरण तापलं तेव्हा आजी स्वत:चं घरातून कुणालाही न सांगता बाहेर पडल्याचा बनाव रचला.

यशोधरा आजींबाबत 22 जूनच्या पहाटेच्या वेळी पोलिसांना याची माहिती मिळाली. सकाळी 7 वाजता पोलिसांचं पथक तातडीनं दिनकर राव देसाई मार्गावरील घटनास्थळी दाखल झालं आणि या आजींना जवळच्या ट्रॉमा केअरमध्ये नेण्यात आलं. आजींच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा असल्यानं त्यांना तातडीनं उपचारांची गरज होती.

पण ट्रॉमा केअरमध्ये हे उपचार होऊ न शकल्यानं पोलिसांच्या पथकानं आजीला कूपर रुग्णालयात नेऊन तिला दाखल केलं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी त्या आजींवर उपचार सुरू झाले. वयोमानानुसार त्या आजींना काहीही नीट सांगता येत नव्हतं. “नातवाला मी नको, म्हणून त्यानं मला सोडलं,” इतकंच त्या बोलू शकल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर आजीनं एक दोन ठिकाणांचे पत्ते त्यांना दिले, पण तिथं या आजींना कोणीच ओळखत नव्हतं, अशी माहिती आरे कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली होती.

Back to top button
error: Content is protected !!