महाराष्ट्र
Trending

वाल्मिक कराड : अटकेनंतर कोर्टात हजर करण्यासाठी 24 तासांचा अवधी असताना असं काय घडलं की रात्री 11.30 वाजता वाल्मिक कराडला घाई.. घाई.. घाई.. कोर्टात हजर का करावं लागलं ? माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गृहविभागाला जळजळीत सवाल

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर – अटकेनंतर कोर्टात हजर करण्यासाठी 24 तासांचा अवधी असताना असं काय घडलं की रात्री 11.30 वाजता वाल्मिक कराडला कोर्टात घाई.. घाई.. घाई… हजर करावं लागलं असा जळजळीत सवाल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहविभागाला उपस्थित केला. पवनचक्की मालकास २ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंडही वाल्मिक कराड असल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.

शरण आल्यानंतर दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात फरार असलेला आरोपी वाल्मिक कराडला ३१ डिसेंबर रोजी पुण्यात दुपारी अटक करून रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. केज न्यायालयासमोर त्यास हजर केले असता न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या नाट्यमय घडामोटीनंतर सीआयडीसह महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या कामकाजावर आशर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आत्मसमर्पन हे पोलिसांच्या परिभाषेतच नाही. कायद्याच्या परिभाषेत नाही. सरेंडर हा शब्दच नाही. याच्यात दुसरी मजेशीर गोष्ट असं काय घडलं होतं की त्याला रात्री 11.30 वाजता कोर्टात घेवून गेले. २४ तास असतात ना. अटक केल्यानंतर तुम्हाला २४ तासांत कोर्टात हजेरी द्यायची असते. आज सकाळी नेलं  असतं ना कोर्टात. रात्री 11.30 वाजता कोर्टात घेऊन जाणं.. असं घाई घाई घाई का ? असा सवाल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

दरम्यान, दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला फरार वाल्मिक कराड काल दुपारी पुण्यात शरण आला. सुमारे १२ वाजेच्या सुमारास तो शरण आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्याने शरण आल्यानंतर त्यास सीआयडीने अटक केली. त्यानंतर रात्री उशीरा त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास रात्रीच्या सुमारास केजच्या कोर्टात हजर करण्यात आले. तेथे दोन्ही बाजुंच्या वकीलांनी युक्तीवाद केला. कराडच्या वकीलांनी युक्तीवाद केला की कराड हा समाजसेवक असून गरीब राजकारणी आहे. त्याच्यावर कलमही चुकीचे लावण्यात आले आहे. सीआयडीच्या वकीलाने जोरदार युक्तीवाद करताना कराडवर २ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप असला तरी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि खंडणी प्रकरण यात कनेक्शन आहे. याशिवाय फोनवर संभाषणही झालेले आहे. त्यामुळे तपास करण्यासाठी सीआयडी सरकारी वकीलांनी सीआयडी कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून मा. कोर्टाने वाल्मिक कराड यास 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.

Back to top button
error: Content is protected !!