काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी एकटे राहुल गांधी पुरेसे, अरविंद केजरीवाल यांनी साधला निशाणा !

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि म्हटले की, काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी राहुल गांधी “पुरेसे” आहेत. आम आदमी पार्टी (आप) भाजपची ‘बी-टीम’ म्हणून काम करत असून काँग्रेसला कमकुवत करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी फेटाळून लावला.
‘एनडीटीव्ही’ने आयोजित केलेल्या ‘टाउनहॉल कार्यक्रमात’ एका प्रश्नाला उत्तर देताना ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल म्हणाले, “काँग्रेसला कमकुवत करण्याची गरज आहे का? राहुल गांधी पुरेसे नाहीत का?”
‘आप’ काँग्रेसला कमकुवत करत आहे आणि भाजपची ‘बी-टीम’ म्हणून काम करत आहे, असे आरोप राजकीय प्रतिस्पर्धी करत आहेत, या आरोपांवर त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’वर केजरीवाल म्हणाले, “त्यांना करू द्या. प्रत्येकाने चांगले काम केले पाहिजे. (काँग्रेसला) शुभेच्छा.”
केंद्रात ‘आप’ची सत्ता आली आणि पंतप्रधान झाल्यास अशा गोष्टी घडतील का, असे विचारले असता केजरीवाल म्हणाले,
“लोकशाहीत लोक निर्णय घेतात. सगळे एकत्र आल्यावर ते ठरवतील.”
विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिले, नागरिकांना मोफत आणि चांगल्या आरोग्य सेवा दिल्या आणि देशातील प्रत्येक तरुणाला नोकऱ्या दिल्या, तर पाच वर्षांत भारत जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो, असे केजरीवाल म्हणाले.