
Nashik – बहुचर्चित अशा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 2026 मध्ये होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील 13 आखाड्याचे महंत यांची आज रविवारी (ता. 1 जून) कुंभमेळ्याशी संबंधित महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व आखाड्याच्या प्रमुखांनी आपले म्हणणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडत आपल्या मागण्याही त्यांना सांगितल्या. तसेच, यावेळी सर्व साधू महंतांनी चर्चा करून अमृत स्नानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये 31 ऑक्टोबरला कुंभमेळा सुरू होणार आहे. तर हा कुंभमेळा 24 जुलै 2028 रोजी समाप्त होणार आहे. म्हणजेच तब्बल 22 महिने पवित्र कुंभमेळ्याचे पर्व चालणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनुसार, नाशिकमध्ये एकूण तीन अमृत स्नान होणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 ला नाशिकमधील पंचवटी येथे असलेल्या रामकुंड या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होईल. त्यानंतर या कुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्या या दिवशी होईल. त्यानंतर या कुंभमेळ्यातील दुसरे अमृत स्नान हे श्रावणातील अमावस्येला म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 ला होईल.
त्यानंतर तिसरे अमृत स्नान हे 11 सप्टेंबर 2027 या दिवशी होईल. 24 जुलै 2028 ला सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वज अवतरण होईल, म्हणजेच या कुंभपर्वाची समाप्ती होईल. महत्त्वाची बाब म्हणजे, या 22 महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 42 ते 45 पर्व स्नान होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे. कारण गुरू हा तीन वेळा सिंह राशीतून मार्गस्त होऊन पुन्हा परतणार आहे. तर याच कालावधीत उज्जैन येथेही कुंभमेळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीला 10 शैव आखाड्यांचे 20 महंत तर 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत उपस्थित होते. या बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली. त्यामुळे राज्य सरकारकडून तसा ठरावही संमत करण्यात आला असून आता कुंभमेळ्यात होणाऱ्या स्नानाला अमृत स्नान असे संबोधण्यात येईल. तसेच, या बैठकीत नाशिक साधुग्रामसाठी कायमस्वरूपी 1500 एकर जागा अधिग्रहीत करण्यात यावी, याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच, गोदावरी प्रदुषणमुक्त आणि प्राधिकरण या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.