औरंगाबाद जिल्ह्यात (ग्रामीण) जमावबंदीचा आदेश, 9 नोव्हेंबरपर्यंत कडक निर्बंध !
ग्रामीण भागात (37)(1)(3) कलम लागू

औरंगाबाद,दि.21 : औरंगाबाद ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या 37(1) व (3) कलमान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत 9 नोव्हेंबरपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी मंदार वैद्य यांनी कळवले आहे.
मुंबईमध्ये पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई !
मुंबई, 21 ऑक्टोबर– मुंबई पोलिसांनी पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येणे, बेकायदेशीर मिरवणुका, लाऊडस्पीकरच्या वापरासह विविध क्रियाकलापांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलिसांचा हा आदेश १ नोव्हेंबरपासून लागू होणार असून पंधरवड्यासाठी तो लागू राहणार आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.
अधिकारी म्हणाला, शांतता भंग, कायदा व सुव्यवस्था बिघडवणे आणि मानवी जीवन व मालमत्तेला धोका निर्माण होणे यासंबंधी पोलिसांना मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त (कार्यक्रम) यांनी गुरुवारी संबंधित आदेश जारी केले.
आदेशानुसार 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणे, बेकायदेशीर मिरवणूक काढणे, ध्वनिक्षेपक वापरणे आणि फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. तथापि, विवाह, अंत्यसंस्कार, क्लब-कंपनी-सहकारी सोसायटीच्या बैठका, सिनेमा हॉल आणि चित्रपटगृहांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
एका वेगळ्या आदेशात, पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी 3 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
या आदेशानुसार या काळात भडकाऊ भाषण आणि गाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.