
SOLAPUR | – सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी माल विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना नेमक्या कोणत्या अडचणीत येतात, शेतकऱ्यांसोबत व्यापारी कसे वागतात, याची प्रत्यक्ष करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी अनोखी शक्कल लढवली आहे.
बाजार समितीचे नूतन सभापती माजी आमदार दिलीप माने हे पहाटे 4.30 वाजता शेतकऱ्यांसारखे वेषांतर करून, दुचाकीवरून बाजारात पोहोचले. पहाटे चालणाऱ्या लिलावाच्या वेळी नेमकी काय परिस्थिती असते, सुरक्षा रक्षक तैनात असतात का? आडते-व्यापारी शेतकऱ्यांसोबत कसे वागतात, अशा बाबींची पाहणी सभापती दिलीप माने यांनी केली.
या पाहणी दरम्यान माने यांनी शेतकरी आणि व्यापऱ्यांशी संवाद साधला. तर दुचाकीवरून फेरफटका मारत निर्जनस्थळी सुरक्षा रक्षक असतात का? याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान भाजीपाला विभागात लिलावासाठी मोठी गर्दी होतं असल्याचे लक्षात आले. तसेच एकच वेळी भाजीपाला लिलाव असल्याने, शेतकऱ्यांचा एक दिवस आधीच काढलेला माल खराब होतं असल्याचे ही लक्षात आले.
शेतकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता दिवसातून दोन वेळा भाजीपाला लिलाव पार पडणार आहे. सकाळी 6 आणि संध्याकाळी 6.30 वाजता हे लिलाव होतील. वेषांतर करून दिलीप माने यांनी केलेल्या या पाहणीची बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे.